28. विवाहसंबंधी कायद्यात गुन्ह्यांना ‘ही’ शिक्षा आहे…


पती किंवा पत्नी हयात असताना, किंवा पहिल्या जोडीदारापासून घटस्फोट घेतलेला नसताना दुसरा विवाह करणे हा गुन्हा आहे. पहिल्या पत्नीने पतीस दुसऱ्या विवाहास तोंडी अथवा लेखी संमती दिली, तरीही दुसरा विवाह हा गुन्हाच आहे.
भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९४नुसार असा विवाह करणाऱ्या व्यक्तीस सात वर्षांपर्यंत तुरूंगवास, तसेच दंड अशी शिक्षा होऊ शकते. या प्रकारचे गुन्हे न्यायालयाबाहेर तडजोडीने मिटविता येत नाहीत.
पहिल्या विवाहाबद्दल माहिती लपवून दुसरे लग्न करणे हा गुन्हा आहे.
भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९५प्रमाणे या गुन्ह्यासाठी दहा वर्षांपर्यंत तुरूंगवास, तसेच दंड अशी शिक्षा होऊ शकते. या प्रकारचे गुन्हे अदखलपात्र, जामिनपात्र असतात व ते न्यायालयाबाहेर तडजोडीने मिटविता येत नाहीत.
फसवणुकीच्या उद्देशाने, अप्रामाणिकपणे विवाहाचे खोटेच विधी लावून घेणे हा गुन्हा आहे.
भारतीय दंडविधान संहितेतील कलम ४९६प्रमाणे असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस सात वर्षांपर्यंत तुरूंगवास, तसेच दंड अशी शिक्षा होऊ शकते.
या प्रकारचे गुन्हे अदखलपात्र, जामिनपात्र असतात व ते न्यायालयाबाहेर तडजोडीने मिटविता येऊ शकत नाहीत.
भारतात विवाहासाठी वराचे व वधूचे वय कमीत कमी २१ व १८ वर्षे पूर्ण असावे लागते. वर किंवा वधू यांपैकी कोणी या वयोमर्यादेपेक्षा कमी असल्यास तो विवाह बालविवाह ठरतो. असा विवाह गुन्हा आहे. बालविवाहातून जन्मास आलेली संतती ही कायदेशीरच मानली जाते. मात्र बालविवाह बेकायदेशीर ठरविता येतो. बालविवाहाचे नियोजन होते आहे, हे समजताच न्यायालयास योग्य ती माहिती देऊन न्यायालयाकडून अशा बालविवाहासाठी मनाई हुकूम घेता येतो. मनाई हुकूम मिळाल्यानंतरही बालविवाह घडला तरी तो बेकायदेशीरच असतो.
- बालविवाह केल्याबद्दल १८ वर्षावरील २१ वर्षांच्या आतील पुरूषास दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास, किंवा एक लाख रूपयांपर्यंत दंड, किंवा तुरूंगवास आणि दंड अशा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते.
- बालविवाह लावणारे पुरोहित, अशा विवाहास प्रोत्साहन देणारे नातेवाईक, बालविवाह ठरविणारे मध्यस्थ यांनाही दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास आणि एक लाख रूपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते.
- बालविवाहामधील अज्ञान वर अथवा अज्ञान वधू यांच्या पालकांनी बालविवाह लावणे, बालविवाहास प्रोत्साहन देणे, तसेच तो थांबविण्याचा प्रयत्न न करणे हा ही गुन्हा आहे. अशा गुन्ह्याबद्दल त्यांना दोन वर्षांपर्यंत तुरूंगवास आणि एक लाख रूपयांपर्यंत दंड अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते.
पती किंवा पतीच्या नातेवाईकांनी विवाहित स्त्रीचा छळ करणे हा गुन्हा आहे.
भारतीय दंडविधान संहिता कलम ४९८ अ अंतर्गत विवाहितेचा छळ करणाऱ्या पती किंवा पतीच्या नातेवाईकांना या गुन्ह्याबद्दल तीन वर्षांपर्यंत तुरूंगवास व दंड अशी शिक्षा होऊ शकते.
विवाहित स्त्रीचा तिच्या विवाहानंतर सात वर्षांच्या आत संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला आणि तिचा मृत्यूपूर्वी हुंड्यासाठी छळ झाला होता हे सिद्ध झाले तर तिचा पती व सासरचे नातेवाईक तिच्या मृत्यूस जबाबदार आहेत असे गृहीत धरण्यात येते.
भारतीय दंडविधान संहिता कलम ३०४ ब अंतर्गत वरील गुन्ह्याबद्दल पती आणि संबंधितांना कमीत कमी सात वर्षे व जास्तीत जास्त जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. या कलमाअंतर्गत गुन्हे दखलपात्र, अजामिनपात्र असतात व न्यायालयाबाहेर परस्पर तडजोडीने मिटवता येत नाहीत.
एखाद्या व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे हा गंभीर गुन्हा आहे. विशेषतः बायको मनासारखी नाही व कुटुंबाच्या दबावामुळे तिच्यापासून घटस्फोटही घेता येत नाही, म्हणून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे, बायकोच्या चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे हा गंभीर गुन्हा आहे.
भारतीय दंडविधान संहिता कलम ३०६मध्ये वरील गुन्ह्याबद्दल पती व संबंधितांना दहा वर्षांपर्येंत तुरूंगवास व दंड अशी शिक्षा होऊ शकते. या कलमाअंतर्गत गुन्हे दखलपात्र, अजामिनपात्र असतात व न्यायालयाबाहेर परस्पर तडजोडीने मिटवता येत नाहीत.